बदली अपडेट २०२५ - जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली बाबत ग्रामविकास मंत्री 17 मार्च 2025 मंत्रालयीन बैठकीचा अधिकृत वृत्तांत

 दिनांक 28 मार्च 2025 रोजी ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना राज्यातील शिक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्नांबाबत माननीय मंत्री ग्राम विकास व पंचायत राज यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 17 मार्च 2025 रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त पुढील प्रमाणे.
मा. मंत्री (ग्राम विकास व पंचायत राज) यांचे अध्यक्षतेखाली दि.१७.३.२०२५ रोजी आयोजित केलेल्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रत.


सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुढीलप्रमाणे निदेश देण्यात आले :
१ जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी ३१ मे ऐवजी ३० जून या तारखेनुसार प्रक्रिया राबवावी.
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही ३१ मे ऐवजी ३० जून या तारखेपर्यंत राबविल्यास शासन निर्णयातील तरतुदीस व बदली अधिनियमातील तरतुदीस बाधा पोहोचेल. त्यामुळे सदरच्या बदल्या ह्या ३० जून या तारखेनुसार राबविण्याची बाब तपासून घेण्यात येईल.
१) ग्रामविकास विभाग, आस्था-१४
तथापि, जे शिक्षक दि.३० जून रोजी वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत असतील, अशा शिक्षकांना सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदलीसाठी विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत पात्र ठरविण्यात यावे.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

२ सन २०२२ मध्ये काही जिल्हा परिषदांनी विलंबाने अवघड शाळा घोषित केल्या होत्या. त्यामुळे सन २०२२ मध्ये घोषित केलेल्या अवघड शाळांमधील शिक्षकांना २०२५ च्या बदली प्रक्रियेत संधी द्यावी. 
सन २०२२ मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, अशा शाळांमधील ३ वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करुनही सन २०२२-२३ मध्ये बदली झाली नव्हती, अशा शिक्षकांचा ग्रामविकास विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील अनु. क्र. १.७.२ येथील तरतुदीनुसार सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून विचार करावा.
१) ग्रामविकास विभाग, आस्था-१४
तसेच या विभागाच्या पत्र क्र. जिपब-११२५/प्र.क्र.१४/आस्था-१४, दि. २८ फेब्रुवारी, २०२५ मधील अनु.क्र. १ येथे नमुद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्र.७ करीता बदली पात्र होणार नाहीत.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

३ आपसी बदलीने आंतरजिल्हा आलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या आपसी शिक्षकाची पूर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवा ग्राह्य घरुन त्यांची जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी सेवाज्येष्ठता ग्राह्य धरावी.

(पदोन्नतीसाठी पूर्वीची सेवा ग्राह्य धरली जाते).

जि.प. शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली ही ऑनलाईन पोर्टलवर होत असल्याने आपसी बदलीने मिळणारी सेवाज्येष्ठता ही बाब आता कालबाह्य झाली आहे.

तथापि, ऑनलाईन पोर्टलव्दारे बदली धोरणाची अंमलबजावणी होण्यापूर्वी आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवाजेष्ठता जिल्हांतर्गत बदलीसाठी ग्राह्य धरता येणार नाही. याबाबत मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी याचिका क्र. १०२/२०२० व अन्य संलग्न याचिकांमध्ये दि.२१.४.२०२२ रोजी व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र. ४८४९/२०२२ व अन्य संलग्न याचिकांमध्ये दि.२९.११.२०२४ रोजी जिल्हांतर्गत बदलीकरीता शासनाने विहीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करणेबाबत आदेशित केले आहे.
१) ग्रामविकास विभाग, आस्था-१४
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
४ आंतरजिल्हा बदलीपूर्वी सर्व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी. (शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर पदोन्नतीसाठी)

विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद स्तरावर करण्यात येते.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

त्यानुसार आंतरजिल्हा बदलीपूर्वी पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याकरीता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सूचित करण्यात यावे.

तसेच नविन शिक्षक पदभरती होणार पत्र असल्यामुळे या विभागाच्या क्र. आंजिब-२०२३/प्र.क्र.११७/आस्था-१४. दि.२३.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील २.८ मध्ये नमुद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी १० टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२४-२५ करीता शिथील करण्यात येत आहे. तथापि, शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापुर्वी नविन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील.

५ आंतरजिल्हा बदलीसाठी वर्षाच्या मागील संचमान्यतेनुसार रिक्त जागा कळवाव्या. तसेच दि ३१.५.२०२५. पर्यंतची निवृत्तीने सर्व रिक्त होणाऱ्या पदांचा यात समावेश असावा.
आंतरजिल्हा बदलीसाठी दि. ३० सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संचमान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना कळविण्यात यावे.
१) ग्रामविकास विभाग, आस्था-१४
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

६ आंतरजिल्हा बदलीमध्ये पती-पत्नी एकत्रिकरण बदल्या कोणत्याही अटीशिवाय कराव्यात. रोस्टरचा विचार करु नये.

पती-पत्नी एकत्रिकरण बदल्या बिंदुनामावलीचा विचार न करता करणे हे शासन नियमास धरुन नाही.

७ आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आपसी बदली प्रक्रिया राबवावी.
जि.प. शिक्षकांची आंतरजिल्हा बदली ही ऑनलाईन पोर्टलवर होत असल्याने सद्य:स्थितीत आपसी बदली न होता साखळी पध्दतीने आंतरजिल्हा बदली करण्यात येते. तथापि, जिल्हांतर्गत बदलीसाठी शिक्षकांमार्फत देण्यात येणाऱ्या शाळांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन पोर्टलव्दारे बदल्या होतात.
८ पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना वगळण्यात आले (दि.३१.५.२०२६ आहे. रोजी सेवानिवृत्त होणारे शिक्षक) तथापि, जे शिक्षक स्व तालुका सोडून अन्यत्र कार्यरत आहेत, अशा शिक्षकांना याविषयीची अट रद्द होऊन बदलीपात्र ठरवावे.
पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग-१ मधून बदलीपात्र ठरविण्यात यावे.
1) ग्रामविकास विभाग, आस्था-१४
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

९ जिल्हांतर्गत बदलीमधील टप्पा क्र. ७ नुसार बदल्या करणे.
अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्र. ७ राबविण्यात यावा. तथापि, त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे विहीत तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

१० जिल्हा परिषद शिक्षकांची तक्रारीच्या अनुषंगाने बदली करणेबाबत.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणूकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शिक्षकांची बदली करण्याबाबतची किंवा अशा शिक्षकांना तत्सम शास्ती लावण्याबाबतची तरतुद जिल्हांतर्गत बदली धोरणात करण्यात यावी.
ग्रामविकास विभाग, आस्था-१४

उपस्थितांचे आभार मानून बैठक समाप्त झाली.





बदली UPDATES
मंत्रालयीन बैठकीचा वृत्तांत

ग्रामविकास व पंचायत राज या विभागाची शिक्षक बदली संदर्भात बैठक मा.ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. 

मंत्रालयातील परिषद सभागृहात काल १७ मार्च रोजी ग्रामविकास व पंचायत राज या विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक पार पडली. यावेळी मा.राहुल दादा कुल, मा.सत्यजीतदादा तांबे, मा.अभिमन्यू पवार साहेब, मा.सुरेश अण्णा धस, मा.संजय केळकर, मा. निरंजन डावखरे या विधिमंडळ सदस्यांसह ग्रामविकास मंत्रालयाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले साहेब,  शिक्षण विभागाचे उपसचिव श्री. तुषार महाजन साहेब यांच्यासह ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रशासनाच्या विषयपत्रिकेतील खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

१. जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी ३१ मे ऐवजी ३० जून या तारखेनुसार प्रक्रिया राबवावी.

 ➡️ अहिल्यानगर, संभाजीनगर या काही जिल्ह्यांमध्ये अवघड क्षेत्र उशिरा जाहीर करण्यात  आल्याने तसेच अनेक शिक्षकांच्या जन्मतारीख जून महिन्यातील असल्याने बदली पात्र सेवा कालावधी ३१ मे ऐवजी ३० जून करण्याचा आग्रह बैठकीत उपस्थित यांच्या वतीने करण्यात आला यावर ग्रामविकास विभागाच्या वतीने  बदली अधिनियमांमध्ये ३१ मे ही तारीख असल्याने ३० जून या बदलास कायदेशीर अडचणी असल्याचे नमूद केले यावर तात्पुरत्या दुरुस्तीचे अधिकार शासनास असून यापूर्वी ४ मे २२ रोजी एक वर्षापुरता ३० जून हा बदल करण्यात आलेला होता त्याप्रमाणे यावर्षी देखील तात्पुरत्या स्वरूपात ३० जून हा बदल करण्याची मागणी केली, उपस्थित सर्व विधिमंडळ सदस्यांनीही ३० जून ह्या बदल शिक्षकांच्या सोयीचा असल्याने याबाबत प्रशासनाने निर्णय घेण्याची विनंती केली ग्रामविकास मंत्री महोदय यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला असून अभ्यासपूर्वक या निर्णयाबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन या बैठकीत दिले आहे 

२. सन २०२२ मध्ये काही जिल्हा परिषदांनी विलंबाने अवघड शाळा घोषित केल्या होत्या. त्यामुळे २०२२ मध्ये घोषित केलेल्या अवघड शाळांमतील शिक्षकांना २०२५ च्या बदली प्रक्रियेत संधी द्यावी.

➡️ या विषयावर चर्चेच्या वेळी शिक्षक संघाच्या वतीने २०१८ अथवा २०२२ मध्ये अवघड क्षेत्र यादीत समाविष्ठ व पुढे सुगम क्षेत्रात रूपांतरित झालेल्या  शाळेवर अद्यापपर्यंत कार्यरत असलेल्या शिक्षकांना  संवर्ग ३ चा एक संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.  बदली शासन निर्णयातील १.७.२ यामध्ये याबाबतचा उल्लेख असल्याने  जुन्या अवघड क्षेत्रातील व सध्या सुगम क्षेत्रात  रूपांतरित झालेल्या शाळेमधील अद्याप पर्यंत कार्यरत शिक्षकांना संवर्ग ३ ची एक संधी देण्याचे प्रशासनाच्या वतीने मान्य करण्यात आले.

३. आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या आपसी शिक्षकाची पुर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवा ग्राह्य धरुन त्यांची जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी सेवाज्येष्ठता ग्राह्य धरावी.
 (पदोन्नतीसाठी पुर्वीची सेवा ग्राह्य धरली जाते.)

 ➡️ विषय पत्रिकेतील या विषयावर चर्चेच्या वेळी सध्या आपसी बदल्या अस्तित्वात नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले मात्र उपस्थित संघटना प्रतिनिधींच्या वतीने आपसी बदली  सेवा जेष्ठतेबाबतचे प्रचलित शासन निर्णय सादर करण्यात आले यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी प्रचलित शासन निर्णय तपासून त्याप्रमाणे शिक्षकांना लाभ देण्याचे प्रशासनास आदेश दिले आहेत.

४. आंतरजिल्हा बदलीपुर्वी सर्व पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करावी. (शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि पदवीधर पदोन्नतीसाठी)

➡️  राज्यभरातील रखडलेल्या पदोन्नतींबाबत ग्राम विकास मंत्री महोदयांनी नाराजी व्यक्त करत सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिक्षक पदोन्नती वेळेत करण्याबाबत राज्य शासनाकडून लेखी सूचना व निर्देश देण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले साहेब यांनी देखील १०० दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये पदोन्नतीला प्राधान्य देण्यात आलेले असल्याने याबाबत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश सर्व जिल्हा परिषदेला देण्याचे मान्य केले.

५. आंतरजिल्हा बदलीसाठी मागील वर्षाच्या संचमान्यतेनुसार रिक्त जागा कळावाव्या तसेच दिनांक ३१ मे २०२५ पर्यंतची निवृत्तीने सर्व रिक्त होणाऱ्या पदांचा यात समावेश आसावा.

 ➡️ आंतरजिल्हा बदली मध्ये जास्तीत जास्त शिक्षकांची सोय होण्यासाठी पोर्टलवर पूर्ण क्षमतेने रिक्त जागा दर्शवणे गरजेचे असून लातूर सह अनेक जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागा असूनही पोर्टलवर नोंदवल्या जात नाहीत असा आक्षेप अनेक विधिमंडळ सदस्यांनी घेतला यावर शिक्षक हितासाठी पूर्ण क्षमतेने जागा नोंदवण्याचे निर्देश मंत्री महोदय यांनी दिले आहेत.

६. आंतरजिल्हा बदलीमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या कोणत्याही अटीशिवाय कराव्यात रोस्टरचा विचार करु नये.

 ➡️ या बाबतीमध्ये संविधानिक अडचणी असल्याचे सांगत या विषयावर कोणतीही सविस्तर चर्चा झाली नाही 

७. आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आपसी बदली प्रक्रिया राबवावी.

 ➡️ या मागणीबाबत कोणतीही सविस्तर चर्चा झालेली नाही

`मंत्रालयातील या बैठकीच्या वेळी ग्रामविकास विभागाच्या वतीने शिक्षकांच्या अडचण दूर करण्यात येतील मात्र अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठीचा टप्पा ७ च्या वेळी शिक्षकांनी सहकार्य करण्याचे नमूद केले मात्र यावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी थेट आक्षेप नोंदवत  बदली प्रक्रिया नियमानुसार पार पडल्यास टप्पा ७ राबवण्याची गरज भासत नाही याबाबत सविस्तर माहिती सभागृहात दिली. बदल्यांमध्ये समाणिकरण करताना जिल्ह्यातील एकूण रिक्त पदांच्या संख्येनुसार सरासरीने प्रत्येक तालुक्यात आवश्यक पदे अगोदरच काळजीपूर्वक चिन्हांकित करणे गरजेचे आहे. समानीकरण प्रक्रियेद्वारे आवश्यक जागा नियमानुसार ब्लॉक केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शाळांवर शिक्षक उपलब्ध होतात त्यामुळे अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही हे शिक्षक संघाच्या वतीने पुराव्यांसह स्पष्ट करण्यात आले. याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांनी प्रशासनास दिले व या माहितीनुसार टप्पा ७ ची गरज भासू नये असा आशावाद व्यक्त करत शिक्षकांना सहकार्याचे आहे आवाहन केले. 

शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी व याबाबत अनेक ठिकाणी शिक्षकांना सुरू असणारा त्रास थांबवण्यात यावा अशी आग्रही मागणी संभाजीराव थोरात तात्या यांनी केली यावेळी ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार भाऊ गोरे यांनी शाळांच्या गुणवत्तेबाबत काही सूचना करीत मुख्यालय प्रश्नावरती धोरणात्मक निर्णयासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

 विषय पत्रिकेवरील विषयाव्यतिरिक्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने बदली प्रक्रियेत पुढील मागणी करण्यात आली, *आंतरजिल्हा बदली,  शिक्षण सेवक पोर्टल नियुक्ती तसेच अवघड क्षेत्रातून सुगम क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांना पाच वर्षानंतर विनंती बदलीची संधी मिळावी*  तसेच जुन्या निकषानुसार सन २४-२५ मध्ये शाळांवर शिक्षक अतिरिक्त होत असल्यास अशा ठिकाणी बदलीने शिक्षक देण्यात येऊ नये या मागणीचे लेखी निवेदन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब  व प्रधान सचिव एकनाथ डवले साहेब यांना देण्यात आले असून या मागणीबाबत शिक्षक संघाचा पाठपुरावा सुरू राहणार आहे 

संवर्ग १ मध्ये नव्याने समाविष्ट झालेले पीडित शिक्षक तसेच पती-पत्नी व एकल शिक्षक, पी एम श्री, राज्य आदर्श शाळा, दुर्धर आजारी पाल्य असलेले शिक्षक यांच्या मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघ प्रयत्नशील असून ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याकडे  शिक्षक संघाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे.

 ग्राम विकास विभागाच्या या मंत्रालयाने स्तरावरील बैठकीसाठी शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे, उपनेते रावसाहेब रोहकले, शिक्षक समन्वय महासंघाचे अध्यक्ष मधुकर काठोळे, राष्ट्रीय नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, राष्ट्रीय महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष बळवंत पाटील,  राष्ट्रीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब कुल, राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेश काळभोर, राज्य शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले, कार्याध्यक्ष किशनराव इदगे, अहिल्या नगर जिल्हा संघाचे अध्यक्ष प्रवीण ठुबे यांच्यासह सातारा, अहिल्या नगर, पुणे जिल्हा संघासह राज्यभरातील शिक्षक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



ग्रामविकास मंत्र्यांनी दिनांक 17 मार्च 2025 रोजी राज्यातील शिक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक बोलावली आहे. सदर मुद्द्यांवर विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत माननीय ग्राम विकास व पंचायतराज मंत्री निर्णय घेणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली व आंतर जिल्हा बदली बाबत पुढील मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

१. जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी ३१ मे ऐवजी ३० जून या तारखेनुसार प्रक्रिया राबवावी.

२. शा.नि. २०२२ मध्ये काही जिल्हा परिषदांनी विलंबाने अवघड शाळा घोषित केल्या होत्या, त्यामुळे २०२२ मध्ये घोषित केलेल्या अवघड शाळांमतील शिक्षकांना २०२५ च्या बदली प्रक्रियेत संधी द्यावी.

३. आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या आपसी शिक्षकाची पुर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवा ग्राह्य धरुन त्यांची जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी सेवाज्येष्ठता ग्राह्य धरावी. (पदोन्नतीसाठी पूर्वीची सेवा ग्राह्य धरली जाते.)

४. आंतरजिल्हा बदलीपुर्वी सर्व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी. (शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि पदवीधर पदोन्नतीसाठी)

५. आंतरजिल्हा बदलीसाठी मागील वर्षाच्या संचमान्यतेनुसार रिक्त जागा कळावाव्या तसेच दिनांक ३१ मे २०२५ पर्यंतची निवृत्तीने सर्व रिक्त होणाऱ्या पर्दाचा यात समावेश आसावा.

६. आंतरजिल्हा बदलीमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या कोणत्याही अटीशिवाय कराव्यात रोस्टरचा विचार करु नये,

७. आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आपसी बदली प्रक्रिया राबवावी.


ग्रामविकास मंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी याबाबत निर्गमित केलेले पत्र पुढीलप्रमाणे


सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी अवघड क्षेत्र घोषित करणेबाबत  ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक पाच मार्च 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी अवघड क्षेत्र घोषित करणेबाबत विषयाबाबत संदर्भाधिन पत्राच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आपणांस कळविण्यात येत आहे :-

१) दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्रातील शाळांची यादी दर ३ वर्षांनी मार्च महिन्यात पुनर्विलोकन करुन सुधारित करण्याची तरतुद आहे. यापूर्वीची अवघड क्षेत्राची यादी सन २०२२ मध्ये सुधारित करण्यात आली असल्यामुळे सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेकरीता सद्यःस्थितीत सन २०२५ स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी प्रसिध्द करणे आवश्यक आहे.

२) त्यानुसार सन २०२५ स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी १५ मार्चपर्यंत घोषित करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदांनी कार्यवाही करावी. या कालावधीत अवघड क्षेत्राची सुधारित यादी घोषित न केल्यास सन २०२२ ची अवघड क्षेत्राची यादी ग्राह्य धरण्यात येईल. तथापि, याबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील.

तसेच अवघड क्षेत्राची यादी सुधारित करताना संवादछायेचा प्रदेश (Communication Shadow Area) हा केवळ महाप्रबंधक, बीएसएनएल यांच्या अहवालानुसार ग्राह्य न धरता अशा ठिकाणी अन्य कंपन्यांचे Network उपलब्ध आहे का, हे देखील तपासावे. (उदा- Jio, Airtel, Vodafone-Idea)

३) सन २०२५ स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी १५ मार्चपर्यंत घोषित झाल्यानंतर याबाबतची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरीता ८ दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे.

आपली, 

ज्योत्स्ना अर्जुन

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 18 जून 2024 रोजी दिनांक सात एप्रिल 2021 रोजी चा  शासन निर्णय अधिक्रमित करून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण निर्गमित केले आहे ते पुढील प्रमाणे.


प्रस्तावना :-

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन वाचा क्र.१ येथील दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०२२ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना/निवदने शासनास प्राप्त झाली आहेत. तसेच शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील काही तरतूदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिका मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेवून रिट याचिका क्र. ६७७/२०२३ मध्ये संदर्भ क्र. २ येथील दि.१३.०१.२०२३ रोजीच्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन, जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील तरतूदी व त्याअनुषंगाने प्राप्त सूचना/निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी वाचा क्र. ३ येथील दि. १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला. सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.




शासन निर्णय :-

उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारीत धोरण निश्चित करण्यात येत आहे.


व्याख्या :-

१.१ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.

१.२ सर्वसाधारण क्षेत्र: वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.

१.३ बदली वर्षः- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.

१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.

१.५ शिक्षक :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक.

१.६ सक्षम प्राधिकारी : शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.


१.७ बदली अधिकार प्राप्त शिक्षक :-

१.७.१ बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.

१.७.२ अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणुन घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा ३ वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राहय धरण्यात येईल.


१.७.३. बदली प्रक्रीयेमधून वगळण्यात येणारे शिक्षकः-

१) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक.

२) बदली प्रक्रीया सुरु असताना निलंबित / सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक.

१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१: खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.

१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक

१४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक १.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक.

१.८.४ एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस शिक्षक

१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक

१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

१.८.७ मेंदुचा आजार झालेले शिक्षक

१.८.८ यॅलेसेमिया / कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase deficiency व इतर आजार) (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांचेवर उपचार सुरू आहेत असे शिक्षक

१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१.८.१० विधवा शिक्षक

१.८.११ कुमारिका शिक्षक

१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१.८.१४ स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)

खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :

१.८.१५ हृदय शस्रक्रिया झालेले

१.८.१६ एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले

१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले

१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले

१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.

१.८.२० यॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले

१.९ विशेष संवर्ग शिक्षक भाग २: पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)

१.९.१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर,

१.९.२ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,

१.९.३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,

१.९.४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका

१.९.५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी

१.९.६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,

१.९.७ पती-पत्नी दोघांपैकी एक / दोघेही शिक्षणसेवक / तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर,


१.१० बदलीस पात्र शिक्षक :-

बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल (टप्पा क्र. ७ नुसार).नाही


 २. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे:-

२.१ जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे परिशिष्ट-१ मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिध्द करतील.

२.२ प्रशिक्षण :- जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे आयोजित करतील.


२.३ शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे :-

२.३.१ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती निश्चित करतील. सदर कार्यवाही करीत असताना प्रथमतः मा. उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र.३२७८/२०१० बाबत दिनांक १३.९.२०१२ व दिनांक २१.११.२०१२ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिल्हयातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो सम प्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखविण्यात येतील. त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे, त्या जागा दाखविण्यात येतील.

२.३.२ समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाहीत. २.३.३ अशाप्रकारे शाळानिहाय ठेवावयाच्या रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येईल.

२.३.४ शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणांतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही.


२.४ शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे :-

२.४.१ शिक्षणाधिकारी प्रथमतः प्रतिवर्षी बदलीस पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याया प्रसिध्द करतील. तसेच टप्पा क्र.७ साठी पात्र असणाऱ्यांची यादी प्रसिध्द करतील (अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याकरीता राबविण्यात येणाऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या शिक्षकांची यादी प्रसिध्द करतील).

२.४.२ तसेच विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करतील.

२.४.३ उपरोक्त नमूद याद्यांबाबत आक्षेप असल्यास याद्या प्रसिध्द झाल्यापासून तीन दिवसात शिक्षणाधिकाऱ्यांकडे याद्यांमधील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल. या अर्जावर शिक्षणाधिकारी हे पुढील सात दिवसात निर्णय घेतील. शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाने संबंधित शिक्षकांचे समाधान न झाल्यास त्याबाबतचे अपील सदर निर्णयाच्या दिनांकापासून तीन दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे करता येईल. सदर अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी सात दिवसात निर्णय घेतील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला याबाबतचा निर्णय अंतिम असेल.

२.४.४ बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रीया सुरु होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल. बदली प्रक्रीया सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईल मध्ये कोणतीही दुरुस्ती करण्यात येणार नाही.


शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे :

३.१ बदलीस पात्र शिक्षक यांचेकडून जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणूकीसाठी मागविण्यात यावा. (सोबतच्या विवरणपत्र १ नुसार).

३.२ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम त्यांना बदलीने द्यावयाच्या नेमणूकीसाठी देणे आवश्यक राहील. (सोबतच्या विवरणपत्र २ नुसार)

३.२.१ विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीत नाव असताना बदली नको असल्यास किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यासाठीच्या यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा (विवरणपत्र ३).

३.२.२ विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास, किंवा बदलीस पात्र यादीत नाव असल्यास, त्यांनी सोबतच्या विवरणपत्र ४ मध्ये नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा. विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासूनच्या ३० कि.मी. अंतरातील अथवा त्या तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंतीक्रम द्यावा.

३.३ बदलीस पात्र शिक्षकांनी उपरोक्त नमूद केलेप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास किंवा त्यांना त्यांचे पसंतीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल.


४. बदली प्रक्रिया कार्यपध्दती :-

४.१ टप्पा क्र.१ : ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदांपेक्षा कमी पदे रिक्त असल्यास, अशा शाळांमध्ये जर बदलीस पात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल. तथापि, अशा शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांचा बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल. उदा.:- एखाद्या शाळेत १० शिक्षकांचा मंजूर आकृतीबंध आहे. मुद्दा क्र.२.३ नुसार या शाळांमध्ये शिक्षकांच्या तीन जागा रिक्त ठेवावयाच्या आहेत, सद्य:स्थितीत या शाळेत एकच पद रिक्त आहे त्यामुळे आणखी दोन शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहे.

४.१.१ ज्या शाळेत तीन बदलीस पात्र शिक्षक आहेत, अशा वेळी तेथील दोन बदलीस पात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित धरावयाच्या सेवेच्या सेवाजेष्ठतेनुसार बदली करण्यात येईल व अशा पध्दतीने मुद्दा क्र.२.३ नुसार तीन जागा रिक्त ठेवण्यात येतील.

४.१.२. शाळेत एकच बदलीस पात्र शिक्षक आहे अशावेळी त्या एका शिक्षकाची बदली होईल व एकूण दोन पदे त्या शाळेत रिक्त राहतील.


४.२ टप्पा क्र.२ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग १ यांच्या बदल्या :-

४.२.१. टप्पा क्र. १ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-१ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.

४.२.२. विशेष संवर्ग भाग-१ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरुनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र.३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.

४.२.३. विशेष संवर्गांतर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.

४.२.४. एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जेष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमतः बदली अनुज्ञेय राहील.

४.२.५. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील.

४.२.६. या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये (तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने) बदली देता आली नाही तर त्याची बदली विशेष संवर्ग भाग १ मधुन होणार नाही. तथापि, त्यांने विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शविला असल्यास व दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास तसेच असा शिक्षक पुढील बदली संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर असा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहील.

४.२.७. विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

४.२.८. विशेष संवर्ग भाग १ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. अप्रवि- २०१८/प्र.क्र.४६/आरोग्य-६, दि.१४.९.२०१८ मधील तरतूदी नुसार दिव्यांगत्वाबाबतचे ऑनलाईन युडी-आयडी प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर अर्ज व दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती निर्णय घेईल.


४.३. टप्पा क्र.३ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग -२ यांच्या बदल्या

४.३.१. टप्पा क्र.२ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.

४.३.२. जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्र.४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.

४.३.३. जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करु शकेल. 

४.३.४. उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. या तरतुदींप्रमाणे संबंधिताची बदलीस पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक (one unit) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अथवा संबधितांनी मागणी केलेल्या सोयीच्या ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण बदलीस पात्र सेवा झाली असल्यास त्या दोघांनाही बदलीस पात्र धरण्यात येईल.

४.३.५. विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून ३० कि.मी. अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र / दाखला याची पडताळणी गट शिक्षण अधिकारी यांचेद्वारा तालुकास्तरावर करण्यात यावी. ३० कि. मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरच्या ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील.

४.३.६. विशेष संवर्ग भाग-२ अंतर्गत बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

४.३.७. विशेष संवर्ग भाग-२ अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे.


४.४. टप्पा क्र.४ - बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या :-

४.४.१. टप्पा क्र.३ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.

४.४.२. यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची ३ वर्षाची बदली करण्यासाठी निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र-२ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

४.४.३. अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना त्यांची एकूण सेवा जेष्ठता विचारात घेण्याऐवजी ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जास्त झालेली आहे, त्यांना प्राधान्य देण्यात यावे.

४.४.४. अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.

४.४.५. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा क्र. ४ मधील सुधारीत रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.

४.४.६. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.

४.४.७ बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पती पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येईल.


४.५ टप्पा क्र. ५:- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती :-

४.५.१. टप्पा क्र.१, २, ३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल.

४.५.२. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.

४.५.३. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.

वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.


४.७. टप्पा क्र. ७:- अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा टप्पा:-


टप्पा क्र.६ पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक राहिल्यास मुद्दा क्र. १.१० मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे हा टप्पा क्र. ७ राबविण्यात येईल. या टप्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांची यादी प्रथम जाहीर करण्यात यावी. (मुद्दा क्र. २.४.१). विशेष संवर्ग भाग-१ मध्ये समाविष्ट असलेले व टप्पा क्र. ७ साठी पात्र शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांनी बदलीस नकार दर्शविला आहे (मुद्दा क्र.४.२.२ अन्वये) अशा शिक्षकांची बदली या टप्यात होणार नाही.


४.८. कार्यमुक्तीचे आदेश :-

बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा. कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर ते बदली होण्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणावरुन त्यांचे वेतन अथवा कोणतीही देयके अदा करु नयेत. बदलीनंतर संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल तर अशा शिक्षकाविरुध्द मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी,


इतर धोरणात्मक बाबी :-

५.१ शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीनेच करण्याचा निर्णय शासन घेत आहे.

यासाठी खालील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबविण्यात यावी.

५.१.१. राज्य स्तरावर शिक्षकांच्या ऑनलाईन पध्दतीने बदल्यांसाठी एक नोडल ऑफीसरची नेमणूक करण्यात येईल.

५.१.२. तांत्रिक बार्बीसाठी एक कार्यक्रम अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. जिल्हा स्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची त्यांची जबाबदारी राहील.

५.२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्येक शिक्षकाचा पसंतीक्रम दिसेल. शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर संबंधित संगणक यंत्रणेने बदलीच्या पूर्ण प्रकियेची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपलब्ध करुन द्यावी.

४.५.४, बदली प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल.

४.५.५. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र.४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्तअसलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.

४.५.६ विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास, जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल.


४.६ टप्पा क्र.६ :- विस्थापित शिक्षकांसाठी टप्पा :-

टप्पा क्र.५ पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्र.५ मधून उरलेल्या शिक्षकांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्र. ५ नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ५ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील, या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व ५.३ बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दबाव वापरल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम ६(५) चा भंग केला म्हणून ती कृती शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील.

५.४ विनंती बदल्यांसाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही.

५.५ प्रशासकीय अथवा विनंती बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती प्रतिनियुक्ती अशा मार्गाने त्यांच्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणी किंवा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सोयीसाठी इतरत्र पदस्थापना देऊ नये, या प्रकारचा प्रयत्न बदलीतील अवैधता/अनियमितता समजून संबंधित अधिकारी शिस्तभंग कारवाईस पात्र होतील.

५.६ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक १ मे ते ३१ मे पर्यंत करण्यात याव्यात.

५.७ काही शिक्षकांनी त्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भात मा. उच्च वा सक्षम न्यायालयात दावा दाखल केला असल्यास अशा प्रकरणात मा. उच्च न्यायालय वा सक्षम न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सर्वप्रथम अंमलबजावणी करावी व तद्नंतर या शासन निर्णयानुसार जिल्हांतर्गत बदल्याबाबत पुढील कार्यवाही सुरु करावी.

५.८ आरटीई अॅक्टनुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त ठेवणे शक्य नाही. त्यामुळे समानीकरणाचे धोरण सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी नियमानुसार राबविण्यात येईल, याची दक्षता घ्यावी, समानीकरणाच्या जागा निश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हा परिषदांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची समिती गठीत करण्यात यावी. समानीकरणासाठी कोणत्या जागा निश्चित कराव्यात, याबाबतचा निर्णय सदर समितीने घ्यावा.

५.९ जिल्हा परिषद शिक्षकांच्या होणाऱ्या जिल्हांतर्गत बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेच्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये दिनांक १ मे ते ३१ मे पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे. परंतु त्या व्यतिरिक्त काही अपरिहार्य व योग्य कारणास्तव (प्रसुती रजेवर, बाल संगोपन रजेवर, गंभीर अपघातामुळे किंवा इतर बाबी) बदली करावयाची झाल्यास ती बदली न करता प्रतिनियुक्ती करण्यात यावी. सदर प्रतिनियुक्ती ही विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी मान्यतेने करण्यात यावी. प्रतिनियुक्ती करताना खालील बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. :

१) बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर होणाऱ्या रिक्त पदावर प्रतिनियुक्ती करण्यात यावी. २) त्याठिकाणी शैक्षणिक अडचण होणार नाही, याची खात्री शिक्षणाधिकारी यांनी करावी. ३) एक महिन्यात प्रतिनियुक्ती मागणी करणाऱ्या शिक्षकांचे अर्ज मागवून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी यादी तयार करावी.

४) कोणकोणते शिक्षक प्रतिनियुक्तीस पात्र आहेत, हे ठरविण्याबाबत जिल्हा स्तरावर खालीलप्रमाणे समिती नियुक्त करण्यात यावी.

(१) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य.

(२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद

(३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद,

सदस्य


५) समितीने पात्र ठरविलेल्या शिक्षकांमधून सेवा जेष्ठतेने एका जागेसाठी तीन शिक्षकांचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येतील. विभागीय आयुक्त हे सादर केलेल्या प्रस्तावातील एक जागेसाठी एका शिक्षकाला प्रतिनियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करतील.

६) सदर प्रतिनियुक्ती ही पाच वर्षातून एकदा देता येईल. ७) प्रतिनियुक्ती दिल्यानंतर संबंधित शिक्षक पुढील वर्षाच्या बदली (१ ते ३१ मे) होणाऱ्या प्रक्रियेमध्ये सेवा जेष्ठतेनुसार बदलीस पात्र होईल.

८) प्रतिनियुक्ती दिल्यानंतर त्यांची नियुक्ती ज्याठिकाणी असेल त्या ठिकाणची मूळ सेवा घरण्यात येईल.

५.१० बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार :

५.१०.१ संगणकीय प्रणालीद्वारे निर्गमित झालेल्या आदेशाच्या विरोधात बदलीच्या अनियमिततेबाबत तक्रार असल्यास त्याचा निपटारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर झाल्यास संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावरच सत्वर न्याय मिळू शकतो. यासाठी जिल्हांतर्गत बदलीमध्ये शिक्षकांची तक्रार असल्यास सदरच्या तक्रारींची चौकशी करुन निवारण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर एक समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा समावेश असेल. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यापासून संबंधित शिक्षकांनी सात दिवसाच्या आत बदलीबाबत तक्रार असल्यास या समितीकडे तक्रार अर्ज दाखल करावा. तक्रारीच्या संबंधात समितीने चौकशी करुन ३० दिवसाचे आत निर्णय घेण्यात यावा. परंतु बदलीबाबतची तक्रार तपासत असताना गैरसोयीची नियुक्ती म्हणजे बदल्यांमधील अनियमितता नव्हे, असे प्रामुख्याने स्पष्ट करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत घोषित करण्यात आलेल्या अनिवार्य रिक्त जागेवर शिक्षकांची समुपदेशनाने नियुक्ती करता येणार नाही. कारण समानीकरणाचे धोरण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आवश्यक आहे.

५.१०.२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने घेतलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या अनियमितेबाबत विभागीय आयुक्तांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यापासून ७ दिवसाचे आत दाद मागू शकतात. अशा पध्दतीने विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेल्या अपीलवजा तक्रारीवर शक्यतो तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील ३० दिवसांचे आत विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावयाचा आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील.

५.१०.३ वरीलप्रमाणे बदलीच्या आदेशाच्या विरुध्द अपिलीय प्रक्रिया सुरु असताना जर शैक्षणिक वर्ष आरंभ झाले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अपिलीय प्रक्रियेला बाधा न येता व शिक्षकांचे अपिलीय अधिकार अबाधीत ठेवून शिक्षकांना त्यांना नेमून दिलेल्या पदस्थापनेवर हजर होऊन शैक्षणिक कर्तव्ये बजावणे बंधनकारक राहील.

५.१०.४ विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज भरुन बदली करुन घेतलेली आहे व त्या शिक्षकांबद्दल तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, अशा शिक्षकांची बदलीच्या संबंधित संवर्गाच्या कागदपत्रांची तात्काळ पडताळणी करण्यात यावी. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात यावा.

५.१०.५ अशी पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरुन बदली करुन घेतलेली आहे. अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करुन त्याच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित करावी.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२४०६१८११४२४७०१२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.


(पं. खं. जाधव)

उपसचिव, महाराष्ट्र शासन


परिशिष्टांसह संपूर्ण सुधारित बदली धोरण शासन आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

2 Comments

  1. सर आता समुपदेशनाने होणाऱ्या बदल्या होणार की नाही?

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.